Monday, August 11, 2008

अभिनव कामगिरी!

सु़टी असल्यानं माझ्यासाठी आजचा दिवस तसा उशीराच सुरू झाला. मोबाईलची रिंग वाजल्यानं मला जाग आली, आणि उशीरा का होईना, पण आजची सकाळ उजाडली ती 'अभिनव' बातमी घेऊनच. अभिनव बिन्द्रा फायनलमध्ये पोहोचल्याचं कळलं आणि पुन्हा हूरहूर वाटू लागली. साहजिकच आहे, गेले काही दिवस बीजिंगमध्ये मेडलवर नेम मारण्यात आपले नेमबाज चुकत होते ना.. पण अभिनव मात्र अजिबात चुकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपला संयम राखून अभिनवनं थेट सुवर्ण पदक जिंकलं आणि मी ताबडतोब ऑफिसच्या दिशेनं निघाले.

कळलंच नाही पण अचानक माझं मन चार वर्ष मागे गेलं. आणि आठवण झाली अथेन्समधल्या राज्यवर्धन राठोडच्या विजयाची. डबल ट्रॅपमध्ये राठोडनं रौप्य पदक जिंकलं त्या क्षणाची.. एरवी क्रिकेटच्या वेडात बुडालेला भारत त्या दिवशी रौप्यपदकाचं सेलिब्रेशन करण्यात बुडाला होता. अथेन्समधल्या विजयाआधी आणि नंतरही भारतीय नेमबाजांच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिलाय. पण राठोडच्या पराक्रमानं भारतीय नेमबाजीभोवतीचं वलय ख-या अर्थानं वाढलं आणि नेमाबाजांकडून असलेल्या अपेक्षाही. बीजिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून अभिनवनं त्या अपेक्षा चुकीच्या नसल्याचंच सिद्ध केलं. खरं सांगू? If Rathore's win in Athens gave a silver lining to the cloudy scene of India at Olympic, Abhinav has surely put us in a Golden Light. आणि या सोनेरी कीरणांमध्ये अवघा भारत प्रकाशमान झाल्यासारखं वाटू लागलंय.

आज प्रत्येक भारतीय अभिमानानं सांगू शकतोय की, होय आमच्याकडेही आता एक सुवर्णपदक आहे. खास करून बीजिंगमध्ये उपस्थित असलेले खेळाडू आणि पत्रकार- कारण त्यांनाच भारताच्या कामगिरीविषयी प्रश्नांना सारखं सामोरं जावं लागतं. आणि यंदाच्या ऑलिम्पिकदरम्यान तर या सगळ्या मंडळींची चांगलीच पंचाईत होतेय- कारण भारतीयांची हॉकीतली नामुष्की. भरवशाच्या हॉकीत ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्याआधीच पडझड झाली. पण नेमबाजीनं पुन्हा एकदा भारताची लाजच राखली नाही तर शानही वाढवलीय. म्हणूनच अभिनवच्या सुवर्णपदकाची झळाळी आणखीनच उठून दिसतेय. आणि त्याहीपेक्षा उठून दिसतोय तो अभिनवनं दाखवलेला संयम.

नेमबाजीचा खेळ म्हणजे मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारा. इथं एका क्षणासाठी एकाग्रता ढळली तरी मेडल हुकण्याची शक्यता असते. हवं तर मनशेर सिंगला विचारा. बीजिंगमध्येच ट्रॅप इव्हेन्टमध्ये शेवटच्या दोन्ही क्वालिफायिंग राऊंड्समध्ये २४ - २४ असं परफेक्ट यश मिळूनही मनशेरचं फायनलचं तिकाट थोडक्यात हुकलं. कारण आदल्या दिवशी तिस-या राऊंडमध्ये मनशेरचा स्कोअर होता अवघा २०.

पण जिथं मनशेरनं गमावलं, तिथंच अभिनवनं कमावलं. फायनलमध्ये त्याचे सगळे शॉट्स अगदी near perfectच होते. आणि शेवटचा शॉट तर होता १०.८! Simply Unbelievable! अभिनवच्या त्याच शॉटनं त्याला पहिल्या स्थानावर सरकवलं आणि भारताला मिळालं पहिलं वहिलं वैयक्तिक सुवर्णपदक.

अभिनवचं आजचं गोल्ड मेडल असो वा राठोडचं अथेन्समधलं सिल्व्हर , एक गोष्ट मात्र विसरता येत नाही. या दोघांच्याही यशात त्यांच्या टीमचा मोठा हातभार होता. लेफ्टनन्ट राठोडला भारतीय सैन्याचं पाठबळ होतं, तर अभिनवचे वडील पहिल्यापासूनच त्याच्यामागे खंबीरपणं उभे राहिले. चंदीगडमधले मोठे बिझिनेसमन असलेल्या त्याच्या वडिलांनी घराच्या मागच्या अंगणातच त्याच्यासाठी शूटिंग रेंज उभी केली. त्याच भक्कम आधारावर अभिनवचं करियर उभं राहिलं आणि आता त्यावर सोनेरी कळसही चढलाय.
सगळेच जण अभिनवइतके नशीबवान नसतील, पण भारतात आज टॅलेन्टे़ड नेमबाजांची कमी नाही. गरज आहे ती त्यांच्या पायाखालचा आधार आणखी भक्कम करण्याची. तरच अभिनवचं यश ही एक अभिनव सुरूवात ठरेल.

No comments: