Sunday, October 26, 2008

समस्यांच्या विळख्यात क्रिकेट

मोहाली टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरनं ब्रायन लाराला मागे टाकलं आणि सर्वाधिक रन्स करणा-या बॅट्समन्सच्या यादीत अव्वल स्थान गाठलं. क्रिकेटच्या इतिहासातला हा नवा आध्याय रचला जात असताना प्रेक्षकांनी मात्र त्याकडे पाठ फिरवल्याचंच दिसून आलं होतं...
त्याआधी बँगलोर टेस्टमध्येही चित्र काही फारसं वेगळं नव्हतं..
गेला काही काळ क्रिकेट सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांपेक्षा रिकाम्या खुर्च्यच जास्त दिसताहेत. आणि याच गोष्टीमुळं इंटरनॅशनल क्रिकेट कौंसिलही चिंतेत पडलंय. आयसीसी सीइओ हरून लॉर्गट यांनी मोहली भेटीदरम्यान आपली ही चिंता बोलूनही दाखवली होती.

भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना होत असताना स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीत घट झालीय. लोक स्टेडियममध्ये जाण्यापेक्षा टेलिव्हिजनवर सामने बघणं पसंत करतायत. आजकाल तर मॅचदरम्यान टीव्ही ऑन केला जातो, तोही केवळ स्कोअर पाहण्यापुरताच. त्यामुळं फक्त टेस्टचंच नाही क्रिकेटच्या खेळाचंच भवितव्य धोक्यात येऊ शकतं..

हा सगळा ट्वेन्टी 20चा परिणाम असं कुणीही सहज म्हणेल. पण क्रिकेटपुढच्या या समस्येची कारणं तेवढ्यापुरतीच मर्यादीत नाहीत. बदलत्या काळाइतकीच आयसीसीची चुकलेली धोरणं आणि न घेतले गेलेले निर्णयही क्रिकेटच्या या परिस्थितीला जबाबदार आहेत.

खरंतर एलिटिस्टस् स्पोर्ट, जंटलमेन्स गेम अशी क्रिकेटची ओळख. पण आज हा खेळ आपल्या या मुखवट्याच्याच कोषात अडकून पडल्यासारखा वाटतोय. आजही केवळ दहा देशांनाच टेस्ट क्रिकेटचा दर्जा मिळवता आलाय. त्यातही केवळ निम्मे संघ सध्या सुस्थितीत आहेत.

क्रिकेटची जन्मभूमी असलेल्या इंग्लंडमध्ये क्रिकेटला जिवंत ठेवण्यासाठी ट्वेन्टी 20चं इंजेक्शन द्यावं लागलं. पण त्यानंतरचं चित्रही फारसं आशादायी नाही. क्रिकेटला इथं स्पर्धा करावी लागतेय फूटबॉलसारख्या लोकप्रिय आणि well organized खेळाची.

एकेकाळी क्रिकेटवर राज्य करणा-या वेस्ट इंडिजचं साम्राज्य केव्हाच कोसळलंय. मैदानात भल्याभल्यांना धडकी भरवणारे वेस्ट इंडिजचे स्टार्स अस्ताला गेले आणि कॅरिबियन क्रिकेटची भट्टी पुन्हा जमलीच नाही. ब्रायन लाराच्या निवृत्तीनंतर तर वेस्ट इंडिजकडे एकही ताकदवान गडी उरलेला नाहीय. एक स्टॅनफर्ड लीगचा अपवाद सोडला तर कॅरिबियन क्रिकेटला संजीवनी देण्याचे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. अर्थात ही लीगही खेळापेक्षा पैशाला समोर ठेवून आखल्यासारखी वाटते.

क्रिकेटवर सध्या वर्चस्व गाजवणा-या ऑस्ट्रेलियालाही उतरती कळा लागलीय. कांगारूंचा आधार असलेले अनेक मोहरे आता निवृत्तीच्या मार्गावर आहेत. आणि ह्या टीमचा प्रवासही वेस्ट इंडिजच्या वाटेनं होण्याची भीती क्रिकेटवर्तुळात व्यक्त केली जातेय.

श्रीलंका आणि भारतीय क्रिकेटपुढेही हीच समस्या उभी आहे.

तर दुसरीकडे टेस्टचा दर्जा मिळून आठ वर्ष झाली तरी बांगलादेश क्रिकेट जगतात रांगायलाही शिकलेला नाहीय.

राजकीय संघर्ष आणि दहशतवादानंही क्रिकेटपुढची आव्हानं आणखी वाढवली आहेत. दक्षिण आफ्रिकेनं वर्णभेदावर मात करून ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्याची हिम्मत तर दाखवली, पण तिथलं क्रिकेटही आता कोटा सिस्टिमचे चटके सहन करतंय. झिम्बाब्वे क्रिकेटची तिथल्या राजकीय अस्थिरता आणि हुकुमशाही राजवटीमुळं साफ वाताहात लागलीय. झिम्बाब्वेनं २००५नंतर एकही टेस्ट सामना खेळलेला नाही. तर पाकिस्तानलाही 2008मध्ये एकही टेस्ट सामना खेळता आलेला नाही. सुरक्षिततेचं कारण पुढे करत अनेक देशांनी पाकिस्तानकडे पाठ फिरवलीय.

न्यूझीलंडसारख्या देशांतील क्रिकेट बोर्डांना आर्थिक समस्याही भेडसावतायत. आणि म्हणूनच तिथल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा इंडियन क्रिकेट लीगसारख्या स्पर्धांना जवळ केलंय. क्रिकेटपुढच्या समस्यांचा हाही एक वेगळा पैलूय.

आयसीएल आणि बीसीसीआयमधल्या युद्धाचाही क्रिकेटला मोठा फटका बसलाय. भारतातील अनेक युवा खेळाडूंनी आयसीएलची वाट धरलीय. या सगळ्या खेळाडूंना बीसीसीआयनं दूर केल्यानं देशांतर्गत क्रिकेट मात्र आणखी दुबळं होऊ शकतं.

आयसीसीच्या अनेक सहसंलग्न देशांमध्ये तर देशांतर्गत क्रिकेटची अवस्था आधीच चिंताजनक आहे. तर २००३च्या विश्वचषकात सेमीफायनल गाठण्याचा पराक्रम करणा-या केनियात क्लब क्रिकेटचाही विकास होऊ शकला नाहीय.

चांगल्या खेळाडूंच्या अभावामुळं मजबूत टीम्स निर्माण होऊ शकलेल्या नाहीत आणि क्रिकेटमधली स्पर्धाही मर्यादीत राहिलीय. ही परिस्थिती जैसे थे राहिली तर प्रेक्षकांचा या खेळातला रस आणखी कमी होऊ शकतो, जे क्रिकेटला परवडणारं नाही.
क्रिकेटला वाचवण्यासाठी -

क्रिकेटला या संकटातून वाचवणं कठीणही नाही. पण त्यासाठी काही ठोस पावलं उचलावी लागतील.

१. तिकिटांच्या किमतीत घट केल्यास सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांनाही स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद लुटता येईल.

२. स्टेडियम्समध्ये प्रेक्षकांच्या सोयी सुविधांची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे.

३. क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक आखताना आणखी विचार होणं गरजेचंय. एरवी सारखंच भारत आणि ऑस्ट्रेलियामधले सामने पाहणं कोणाला आवडेल ?

४. हे वेळापत्रक आखताना टेस्ट, वन डे आणि ट्वेन्टी २० सामन्यांमध्ये समतोल साधणंही आवश्यक

४. अधूनमधून हॉलंड, कॅनडा, यांसारख्या सहसदस्य देशांमध्ये मोठ्या संघांचे सामने खेळवल्यास क्रिकेटच्या प्रसारात मदत होईल.

५. पण केवळ सामने भरवून चालणार नाही, तर इतर देशांतील खेळाडू घडवण्यासाठी ठोस पावलं उचलणं आवश्यक.
अर्थात केवळ अशा योजना बनवून चालणार नाही, तर सर्व क्रिकेट जगतानं एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत. अगदी आयसीएलसारख्या वेगळ्या प्रवाहांनाही आपल्यात सामावून घेण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचंय. आणि क्रिकेटला वाचवण्याच्या या प्रयत्नांत जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड या नात्यानं बीसीसीआय़नं मोठा वाटा उचलणं गरजेचय.

- जान्हवी मुळे

No comments: